श्रीराम श्रीराम श्रीराम !
रामाची सेना पुढे सरसावली. रावणाची सेना मागे हटली. रावण चिंतेत पडला. काय करावे सुचेनाच. “भाऊ कुंभकर्णाला उठवू या” त्याने ठरवले. कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. कुंभ पर्वतासारखा वाटायचा. उठवायचं कसं हा प्रश्न मोठा! राक्षसांनी ढोल ताशे वाजवले. छाताडावर हत्ती नाचवले. नाकात तिखट पाणी ओतले. तेव्हा कुठे महाशय जागचे हलले! कुंभकर्ण उठला डोळे चोळला, आणि विचारले—”खायला काय आहे?” गाडाभर भात लाडवांची रास शेकडो रेडे आणि बोकड खास! तो एका दमात सगळं फस्त करतो. ढेकर देतो—ढगांचा गडगडाट वाटावा अशी!
रावण म्हणतो “भावा युद्धात मदत कर. रामाचा शेवट कर!” कुंभकर्ण सत्याचा पुजारी. तो म्हणतो “सीता परत कर.
प्रश्न सुटेल. युद्ध हवेच कशाला?”
पण रावणाने पुढे केले मद्य आणि मांस. कुंभकर्ण लगेचच झाला लढायला तयार! तो गर्जला अजस्त्र देह हलला बघूनच वानरवृंद बेशुद्ध पडला! कुंभकर्णाला ठाऊक होतं हे युद्ध अन्यायाचं आहे. रावण शेवटी हरतोच हे त्याला कळत होतं. पण भावाचं कर्तव्य, म्हणून तो रामसेनेशी लढला. कुंभकर्णाचा शेवट जवळ आला. “श्रीरामाच्या हातूनच, मृत्यू यावा,” हीच होती कुंभकर्णाची शेवटची इच्छा!
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

