हर्षवर्धन, ह्युएनत्संग आणि बुद्ध सर्किट पर्यटन.
एक होता राजा – हर्षवर्धन. विद्वान, शांत, उदार राजा.
त्याचं साम्राज्य अफाट होतं. पण ते त्यानी तलवारीने नाही, तर ज्ञान, धर्म आणि प्रेमानी जिंकलं होतं.
राजा कविता करायचा, विचारवंतांचा सल्ला ऐकायचा,
तो शिवभक्त होता. तो गौतम बुद्धाचाही चाहता होता.
सगळ्या धर्मांचा आदर करणारा – असा हा सम्राट!
त्याच काळात चीनमधून ह्युएनत्संग नावाचा एक बौद्ध भिक्षू भारतात आला.
पायात चप्पल नाही, खांद्यावर झोळी…
वाळवंटं पार केली, डोंगर चढला – कारण त्याला पाहायचा होता बुद्धाचा देश! जिथे गौतम बुद्ध जन्मला. वावरला.
त्याला समजलं, भारतामधला धर्म पुस्तकी नाही. धर्म लोकांच्या मनात, रोजच्या जीवनात आहे. इथले लोक धर्म जगतात. नम्रतेनं, प्रेमानं!
ह्युएनत्संगने हर्षवर्धनला भेट दिली.
राजाने प्रयाग आणि कनोज येथे मोठ्या धर्मसभा भरवल्या.
हजारो बौद्ध, जैन, सनातन विचारवंत एकत्र बसले.
“धर्म म्हणजे भांडण नाही, तो सहवास आहे!” – हे शिकवलं गेलं.
ह्युएनत्संग भारावून गेला.
भारताच्या विकसित संस्कृतीचं त्यानी “सी-यू-की” या त्याच्या पुस्तकात वर्णन केलं आहे.
त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीची ओळख जगभर पोचली.
आजही तोच विचार पुढे चालतो आहे.
भारत सरकारने ‘बुद्ध सर्किट’ नावाचा एक सुंदर पर्यटन मार्ग तयार केला आहे.
गौतम बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळं एकमेकांशी जोडली आहेत –
लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर…
हजारो लोक त्या पवित्र जागांवर जातात. नतमस्तक होतात.
बुद्धाच्या पावलांवर पाऊल ठेवतात. भारताचा अनुभव घेतात.
“इतिहासाची वाट चालणारे हे पाय… उद्याच्या पर्यटनामुळे संपन्न झालेल्या भारताचं रूपडं बदलत आहेत.”
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


