Dr. Anil Mokashi

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला…

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता पृथ्वीमातेच्या कुशीत गेली. श्रीरामांना खूप दुःख झालं. तरी त्यांनी कर्तव्य बुद्धीने रामराज्य चालवलं. लव आणि कुश यांना वेगवेगळी राज्यं दिली. दोघांचा राज्याभिषेक केला. पण त्यांचं मन कशातच रमेना. आता त्यांचं अवतार कार्य संपलं होतं. त्यांनी मनापासून प्रार्थना केली. ती ब्रह्मदेवापर्यंत पोचली. एक दिवस एक तपस्वी रामांना भेटायला आला. तो काळ होता! तपस्व्याच्या रूपात आला होता. त्याला रामाशी एकांतात बोलायचं होतं. तो म्हणाला –”आपलं बोलणं कोणीही ऐकू नये. जो ऐकेल त्याचा मृत्यू निश्चित!” रामाने लक्ष्मणाला आज्ञा दिली “कोणालाही आत येऊ देऊ नकोस!” इतक्यात दुर्वास मुनी आले. ते फार रागीट होते. ते ओरडले “रामाला भेटायचं आहे! मला आत सोड!” लक्ष्मण म्हणाला “तुम्ही थांबा! श्रीरामांची आज्ञा आहे” दुर्वास मुनी रागावले “मला आत सोडले नाहीस, तर अयोध्या भस्मसात करीन अयोध्या बेचिराख करीन अयोध्येची राखरांगोळी करीन!”लक्ष्मणाला प्रश्न पडला.” नियम पाळू? की अयोध्या वाचवू?” लक्ष्मणाला माहीत होतं. पुढे धोका आहे. नियम मोडला तर मृत्यू . “लक्ष्मणाचा हा निर्णय आयुष्याचा शेवटचा निर्णय ठरणार होता. पण अयोध्येला वाचवण्यासाठी तो स्वतःचा बळी द्यायला तयार झाला!” त्यानी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुर्वास मुनींना आत सोडलं. राम आणि तपस्वी यांचा एकांत भंग झाला! लक्ष्मण शांतपणे यमुनेच्या तीरावर गेला. आणि त्याने जलसमाधी घेतली. पवित्र यमुना नदीच्या विशाल पात्रात प्रवेश केला. “रामाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. अश्वमेध यज्ञ जिंकला, पण सावलीसारखी साथ देणारा निस्वार्थ भाऊ हरपला!” तपस्व्याच्या रूपात आलेल्या काळाने रामाला सांगितलं. ” तू भगवान विष्णूचा मानवी अवतार आहेस. पृथ्वीवर वाईट लोक जास्त प्रबळ झाले आहेत. चांगल्या लोकांना जगणे कठीण झाले आहे. रामाचा अवतार घे. आणि पृथ्वीवर मानवी जीवन सुलभ होईल, लोक सुखाने समाधानाने, सरळ मार्गाने जगू शकतील अशी व्यवस्था कर.” रामावतारातील रावण संहाराचं कार्य संपल होतं. पृथ्वी राक्षसमुक्त आणि भयमुक्त झाली होती. ब्रह्मदेवाने रामावतार संपवून वैकुंठात परत यायचा आदेश दिला होता!” श्रीरामांनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. शरयू नदीत प्रवेश केला. आणि इहलोकाची यात्रा संपवून वैकुंठाला गेले. श्रीरामांचा दिव्य अवतार संपला. श्री रामायणाची इतीश्री झाली.आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देव, ऋषी, आणि चराचर सृष्टीने जयघोष केला! प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 53 – रामाचा अवतार संपला… Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 52 – सीता धरतीमातेच्या कुशीत

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामाने, सीतेला स्वीकारले. पण एक, अट टाकली. सीतेने परत, जनतेसमोर , अग्निपरीक्षा द्यावी. आपली पवित्रता, सिद्ध करावी. लंकेत तिने आधीच अग्निपरीक्षा दिली होती. पण अयोध्येच्या काही मूठभर लोकांचा त्यावर विश्वास नव्हता. ते म्हणत. वर्षभर रावणाच्या ताब्यात असलेली सीता शुद्ध कशी. या प्रश्नाचे उत्तर रामा जवळ नव्हते. राजाला उत्तर देणं आवश्यक होतं. राज्यात आणि आजू बाजूला दुष्ट राक्षसी प्रवृत्ती घातपाती कारवाया दंगली करत होत्या. राजावर प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी होती. पत्नीला न्याय देण्यासाठी राज्य सोडता येणार नव्हते. त्यानी निर्णय घेतला. राष्ट्र प्रथम. रामाला दुःख झालं. पण कर्तव्याला प्राधान्य देत त्याने अग्निदिव्याची अट घातली.सीता त्यातून सुखरूप निष्कलंक बाहेर पडेल याची त्याला खात्री होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. सीतेने पृथ्वीमातेला विनंती केली. ‘मी निःकलंक असेन तर मला आपल्या कुशीत घे’ त्या क्षणी पृथ्वी दुभंगली तेजस्वी प्रकाश पसरला आणि भूमातेने सीतेला आपल्या कुशीत घेतलं. लव-कुश आईला वाचवायला धावत गेले, पण तोपर्यंत सीता अदृश्य झाली होती. राम, दुःखाने कोसळला.जमिनीला पडलेल्या भेगा मिटल्या होत्या. सीता पृथ्वीमध्ये विलीन झाली होती. सीतेचा अध्याय संपला होता. आता आदर्श पत्नी आदर्श पतिव्रता आदर्श राणी आदर्श माता सीतामाता पृथ्वीवर कधीही कोणालाही दिसणार नव्हती. हे कटू सत्य स्वीकारून सर्वांना पुढचं आयुष्य जगावं लागलं. जगायला आधार एकच उरला होता. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 52 – सीता धरतीमातेच्या कुशीत Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 51 – लवकुश मोठे झाले

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लवकुश रामाच्या सैन्याशी लढतच होते. श्रीरामांना प्रश्न पडला “इतकी शूर मुलं कोण आहेत?” वाल्मिकी ऋषींनी लवकुशांना आज्ञा दिली.“रामाशी युद्ध, थांबवा! आणि आता यापुढे रामाचं गुणगान करा. मी शिकवलेलं रामायण गा! श्री रामांचं चरित्र त्यांनाच ऐकवा. पण दान घेऊ नका इनाम घेऊ नका!” गुरुजींची आज्ञा ऐकून लवकुश नरमले. त्यांना कळलं – “आपल्याला गुरुजींचं ऐकावंच लागेल.” ते समंजसपणे आपले वागणे, बदलायला तयार झाले. सीता दोघांना बाजूला घेऊन म्हणाली “पती म्हणून त्यांचं प्रेम खरं होतं. राजा म्हणून त्यांनी कर्तव्य केलं. प्रजेच्या भल्यासाठी त्यांना मोठा त्याग करावा लागला.” आईचे ऐकून लवकुश बदलले. धनुष्यबाण खाली ठेवले. युद्धाचा वेष बदलला. आश्रमाचा भगवा वेष परिधान केला. रामायण गाण्यासाठी परत आले. रामायणाच्या गोष्टी सांगता-सांगताच ते स्वतः आतून आमूलाग्र बदलले. ते समंजस झाले. ते जबाबदार झाले. ते मोठे झाले. ते तरुण झाले. त्यांचे तेजस्वी रामायण गायन ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले.श्रीरामही अतिशय खुश झाले. वाल्मिकी ऋषींनी सांगितले “श्रीरामा, हे दोघे तुझेच पुत्र आहेत!” लवकुशांनी श्रीरामांची अनवधानानी म्हणजे अजाणते पणी युद्ध केले म्हणून क्षमा मागितली. त्यांचे पाय धरले.त्यांचे आशीर्वाद मागितले. श्रीरामांनी त्यांना कडकडून मिठी मारली. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संपूर्ण आश्रम आनंदात न्हाऊन गेला. महर्षींनी सीतेलाही बोलावले आणि रामाला सांगितले “ही शुद्ध आहे पवित्र आहे. माझी आज्ञा म्हणून तू हिचा स्वीकार कर.” श्रीराम म्हणाले, “हो! मी संपूर्ण जनतेसमोर भर दरबारात हिचा स्वीकार करायला तयार आहे. लवकुशांनाही अयोध्येत घेऊन जाईन. पण… अजूनही पण होताच!” संपूर्ण आश्रमात आवाज घुमला. प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय!प्रभू श्रीरामचंद्र की जय! – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 51 – लवकुश मोठे झाले Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता वनात गेली. अयोध्येवर सृष्टी रुसली. पावसाचा थेंब नाही. नदी-नाले सुकले. शेतं करपून गेली. धान्य पिकलं नाही. प्रजेची उपासमार झाली. तहानलेली जनावरं वणवण भटकत होती. पक्षी तडफडत होते. सगळीकडे दु:ख आणि हाहाकार माजला होता. हे बघून, राम अस्वस्थ झाले. प्रजेचं दु:ख त्यांना, सहन होईना.गुरु वशिष्ठांनी सांगितले. सृष्टीच्या कोपावर एकच उपाय.“अश्वमेध यज्ञ”. रामांनी तयारी सुरू केली. शुभ्र पांढरा घोडा निवडला. त्याच्या गळ्यात सोन्याची पाटी लटकवली —”जो या घोड्याला अडवेल त्याला रामाशी युद्ध करावं लागेल!”घोडा गावोगाव धावत सुटला. अनेक राजांनी रामाची सत्ता मान्य केली. घोडा वाल्मिकी आश्रमाजवळ पोचला. लव कुश खेळत होते. त्यांनी इतका उमदा इतका सुंदर इतका पांढरा शुभ्र घोडा कधीच पाहिला नव्हता. तो त्यांना खूप आवडला. घोड्याला पकडून त्यांनी एका झाडाला बांधून ठेवले. घोड्याच्या गळ्यातली पाटी वाचली. दोघंही थबकले. “हा तर रामाचा घोडा!” लव म्हणाला. “त्याच रामाचा ज्यांनी आपल्या निरपराध आईला जंगलात सोडलं!” “आपल्या आईवर अन्याय करणाऱ्या राजाचा अश्वमेध आपण अडवायचाच!” कुश ठामपणे म्हणाला. थोड्याच वेळात रामाची सेना आली. सेनापतीने हुकूम दिला, “घोडा सोडा!””नाही!” लव-कुश ठामपणे म्हणाले. युद्ध सुरू झालं. लव-कुश लहान असले तरी शूर आणि पराक्रमी होते. त्यांनी रामाची बलाढ्य सेना पराभूत केली. लक्ष्मण स्वतः युद्धासाठी आले. पण लव-कुशांनी त्यांनाही हरवलं.शेवटी राम स्वतः आश्रमात आले. त्यांनी या लहान मुलांचं धैर्य पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. पण इतक्यात गुरु वशिष्ठ पुढे आले. त्यांनी आपले शिष्य लव कुश यांना आदेश दिला “युद्ध थांबवा!” त्याक्षणी लव कुश थांबले. गुरूची आज्ञा पाळली. सगळीकडे शांतता पसरली. रामाच्या सेनेला घाबरून नाही. गुरूची आज्ञा म्हणून ते थांबले. राम त्या शूर मुलांकडे बघतच राहिले. त्यांना प्रश्न पडला. कुणाची असतील बरे इतकी तेजस्वी शहाणी आणि आज्ञाधारक मुले? प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 50 – रामाचा अश्वमेध Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीरामांची आज्ञा. म्हणून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडलं. सीतेनी त्याला सांगितलं” या वनात एकटी जाणं माझ्या नशिबात आहे, पण रामांचा वारसा माझ्या पोटात वाढतोय.” दुःख होऊ नये म्हणून ही बातमी कर्तव्यकठोर रामाला त्याने कधीच सांगितली नाही. भागीरथी नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींना सीता एकटी सापडली. त्यांनी सन्मानाने तिला आश्रमात आसरा दिला. सुरक्षेच्या दृष्टीने तिचे नाव “वैदेही” ठेवले. तिला मायेचं पांघरूण मिळालं. गर्भारपणी, चांगला नैसर्गिक, आहार, विहार, विचार आणि, गर्भसंस्कार, मिळाले. नऊ महिन्यांनी दोन तेजस्वी बाळांचा जन्म झाला. लव आणि कुश! त्यांच्या बाल लीलांनी सगळे आनंदले. त्यांचं बालपण आनंदी होतं. म्हणून मोठेपणी ते यशस्वी झाले. वाल्मिकी ऋषींनी त्यांना प्रेम दिलं. संस्कार दिले. शिक्षण दिलं. भारतीय गुरुकुल शिक्षण परंपरे प्रमाणे 6 शास्त्रं आणि 64 कला, शिकवल्या. पारंगत केलं. कुणाशी कसं वागायचं. समाजाचे नितीनियम शिकवले. त्यांच्या जीवनाला एक शिस्त लावली. लव ला धनुर्विद्या आवडायची. दिवस संपला तरी सराव चालूच. कुश ला संगीत आवडे. त्याच्या स्वरांनी संध्याकाळी आश्रम भारून जायचा. लव आणि कुश ८-१० वर्षांचे झाले. त्यांची मुंज झाली. अल्लड बालपण संपून अनेक गोष्टी शिकण्याची विद्यार्थीदशा सुरू झाली. ते चौकस, हुशार, उत्साही, आनंदी, समंजस, तेजस्वी, आत्मविश्वासू आणि प्रेमळ झाले. त्यांना बघून कौतुकाने कुणीही म्हणायचे, “मुलं असावी तर अशी. आदर्श” वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामकथा तर मुलांची तोंड पाठ होती. आवडती होती. आश्रमात त्यांची ओळख फक्त “वैदेही”चे, गुणी सुपुत्र अशीच होती. अजूनही रामकथेचं सत्य त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेलं नव्हतं. ते क्षण लवकरच येणार होते. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 49 – लव-कुशांचे बालपण Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 48 – सीतेचा त्याग , रामराज्याचा धर्म.

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रामराज्य म्हणजे सुखाचं राज्य! सगळ्यांना पोटभर जेवायला. अन्याय नाही. सगळे आनंदात. राजा, राजाचा धर्म, म्हणजे कर्तव्य, पाळे. प्रजा प्रजेचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळे. शिक्षक शिक्षकांचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळत. विद्यार्थी विद्यार्थ्यांचा धर्म म्हणजे कर्तव्य पाळत. सगळं आल वेल छान सुरळीत चालू होतं. पण रामाच्या हेरानं, एक बातमी आणली. “रजक नावाचा एक माणूस सगळ्यांना सांगतोय ‘रावणाच्या ताब्यातली सीता पवित्र कशी?’” हे ऐकून रामांना खूप दुःख झालं. त्यांना सीतेच्या पवित्रतेवर तिळमात्र शंका नव्हती. पण राजा फक्त पती नसतो. तो प्रजेचा आधार असतो. प्रजेच्या मनात जर आपल्या राणीबद्दल शंका असेल तर ती शंका दूर करणंही राजाचंच कर्तव्य असतं. रामांनी आपल्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला. रामांनी लक्ष्मणाला आज्ञा दिली “सीतेला वनात सोडून एकटाच परत ये!” लक्ष्मणाचा संताप उफाळला. “त्या रजकाची जीभच छाटून टाकतो!” तो म्हणाला. “नको!” राम म्हणाले. “लोक म्हणतील मी माझा दोष झाकण्यासाठी रजकाला शिक्षा केली. लोकांची तक्रार ऐकलीच पाहिजे. तोच राजधर्म आहे. राजा न्याय करतो भावना नाही. मी पती म्हणून सीतेचा त्याग करू इच्छित नाही पण राजा म्हणून कर्तव्य पाळतोय. हा माझा धर्म आहे.” दुसऱ्या दिवशी लक्ष्मण सीतेला रथात बसवून वनात निघाला. भागीरथी नदीच्या काठावर रथ थांबला. मोठ्या वटवृक्षाखाली सीता विसावली. लक्ष्मणाचे डोळे पाणावले. तो म्हणाला, “सीते, श्रीरामांना माहीत आहे की तुम्ही पवित्र आहात. पण खोट्या अफवांना थांबवण्यासाठी तुमचा त्याग करावा लागतोय. हा त्यांच्या मनाचा मोठा दु:खद निर्णय आहे.” हे ऐकून सीतेचं हृदय तुटलं. अश्रूंनी डोळे भरले. पण तिनं धीर धरला. “लक्ष्मण रामांना सांगा… माझ्या पोटात त्यांची दोन बाळं वाढतायत. त्यांच्या या बाळांसाठी तरी मला जगलंच पाहिजे!” लक्ष्मण जड पावलांनी अयोध्येला परतला. वनात सीता एकटी उरली. फळं कंदमुळे खाऊन दिवस काढू लागली. पण संकटाच्या अंधारात दोन आशेची किरणं दिसत होती. सीतेच्या पोटात वाढणारे श्रीरामांचे तेजस्वी जुळे पुत्र लव आणि कुश! श्रीरामांचे तेजस्वी जुळे पुत्र लव आणि कुश! “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 48 – सीतेचा त्याग , रामराज्याचा धर्म. Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 47 – रामराज्यात सुखास, समाधानाची साथ

श्रीराम श्रीराम श्रीराम ! सीता राम अयोध्येत परतले. सुंदर आणि आदर्श “रामराज्य” उभारलं. सगळीकडे आनंद होता शांतता होती. लोक सुखी होते सुरक्षित होते. कोणालाच उपासमार नव्हती अन्याय नव्हता रोगराई नव्हती. राम आणि सीता प्रजेवर प्रेम करत. लोकांचं भलं व्हावं म्हणून दिवसरात्र काम करत. धर्म संस्कृती यांना महत्त्व देत. लोक प्रामाणिक होते. अयोध्येत अपराध नव्हते भांडणं नव्हती. सगळेजण एकमेकांशी सन्मानाने वागत. ऋषींना देवासारखा मान मिळत होता. विद्वानांचं आदराने स्वागत होतं. संरक्षणासाठी भक्कम सैन्य होतं. खजिना पैशांनी भरला होता. लहान मुलं गुरुकुलात शिकत. विद्वान आचार्य त्यांना चांगले संस्कार देत. अयोध्येतील लोक श्रीरामांच्या उत्तम चारित्र्याचं अनुकरण करत. म्हणूनच सगळेजण सुखी आणि समाधानी होते. राम हे दीपस्तंभ होते. मार्ग दाखवणारे. प्रकाश देणारे. पण… या आनंदनगरीत कुणाला तरी हे सगळं बघवत नव्हतं! कुणाच्या तरी मनात मत्सराचा किडा वळवळत होता. आणि मग कुणीतरी खोडसाळपणे कुजबुज सुरू केली. “रावणाच्या ताब्यातली सीता पवित्र कशी?” अयोध्येवर संकटाचे काळे ढग येऊ लागले होते. प्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जयप्रभू श्री रामचंद्र की जय – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपीपीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 47 – रामराज्यात सुखास, समाधानाची साथ Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 46 – रामराज्यात भव्य स्वागत

श्रीराम श्रीराम श्रीराम ! श्रीराम, लक्ष्मण, आणि सीता, अयोध्येत परत आले. शहर आनंदानं, फुलून गेलं! पुष्पक विमान, आकाशात दिसताच, प्रजाजनांनी, जल्लोष केला. “श्रीरामचंद्र की जय!” असा जयघोष, आसमंतात घुमला. रस्ते फुलांनी सजले. ढोल-ताशांच्या गजरानं, वातावरण दणाणलं. फटाक्यांची आतषबाजी, सुरू झाली, आणि आकाशात, रंगीबेरंगी पताका, फडकल्या! वानरसेना तर, वेड्यासारखी आनंदानं उड्या, मारत होती. साखर फुटाणे, आणि गोड फळं, खात होती. सगळ्या शहरात, सणासारखा, उत्साह होता. अयोध्येत, एक मोठ्ठा रोड शो, झाल्यासारखं, वाटत होतं! रामभरताची, भेट झाली. दोघंही एकमेकांना, घट्ट बिलगले. त्यांना बघून, सगळ्यांच्या डोळ्यात, आनंदाश्रू आले. माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, यांनी श्रीराम, आणि सीतेचं, औक्षण केलं. आईच्या नजरेतलं, प्रेम आणि अभिमान दोन्ही, ओसंडून, वाहत होतं. मग आला, तो शुभ दिवस! श्रीरामांचा भव्य, राज्याभिषेक झाला. अयोध्येच्या राजसभेत, अयोध्येच्या सीमेलगत असलेल्या सर्व राज्यांचे राजे आणि मित्रमंडळी जमली होती – सुग्रीव, विभीषण, अंगद, जांबवंत, हनुमान… सगळे उपस्थित होते. पृथ्वीवर पहिल्यांदाच अभिमानाने भगवा झेंडा फडकला! श्रीरामांना युद्ध नको होतं. शांती हवी होती. दुःख नको होतं. सुख हवं होतं. द्वेष नको होता. प्रेम हवं होतं. हे रामराज्य खरंच स्वर्गासारखं होतं! रामराज्याचं स्वप्न असंच सुंदर आणि प्रेमानं भरलेलं होतं. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 46 – रामराज्यात भव्य स्वागत Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 45 – राम भरत भेट

श्रीराम श्रीराम श्रीराम ! पुष्पक विमान भारद्वाज ऋषींच्या आश्रमाजवळ उतरलं. श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास त्याच दिवशी संपत होता. पण भरताचं मन बेचैन झालं होतं.अजून श्रीराम आले नव्हते. म्हणून त्यानं एक कठोर प्रतिज्ञा घेतली होती — “राम परत आले नाहीत, तर मी अग्नीमध्ये उडी घेईन!” हे कळताच श्रीराम खूप व्याकुळ झाले. त्यांनी हनुमानाला ताबडतोब भरताला आणि गुहाला ते परत आल्याची आनंदाची बातमी द्यायला पाठवलं. हनुमान उडतच निघाला! भरताला म्हणाला “तुमची प्रतिक्षा संपली! श्रीराम, सीता आणि लक्ष्मण सुखरूप परत आले आहेत!” हे ऐकताच भरताच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्यानं हनुमानाला कडकडून मिठी मारली. त्याचा गळा भरून आला. कित्येक वर्षांचा थांबलेला आनंद आज ओसंडून वाहत होता. श्रीराम परत आल्यावर भरतानं चौदा वर्षं जपलेल्या त्या पादुका त्यांच्या पायांत घातल्या. डोळे भरून पाहिलं आणि म्हणाला, “आता तुम्ही अयोध्येच्या सिंहासनावर बसा. आणि रामराज्य स्थापून सगळ्यांना सुखी करा!” भाऊ असावा तर भरतासारखा. निस्वार्थी, प्रेमळ, श्रद्धावान! अयोध्येत बातमी पसरताच आनंदाची लाट उसळली. सगळी जनता नाचू लागली, गाणी गाऊ लागली. सगळीकडे एकच जयघोष ऐकू येत होता. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 45 – राम भरत भेट Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 44 – सीता राम पुष्पक विमानात

श्रीराम श्रीराम श्रीराम ! लंकेचा राजा बिभीषण महान.रामाने केला राज्याभिषेक व सन्मान. सांगितलं त्याला. “धर्माचा मार्ग धर प्रजेचा राजा हो” बिभीषणाचा निरोप घेतला. बिभीषणाने नमस्कार केला. आता अयोध्येचा वेध लागला. सीता-राम, लक्ष्मण सोबतपुष्पक विमानात बसले मस्त!विमान हे अनोखं चाले मनाच्या तालावर. जोरात उड हळू चाल मन मानेल तसं उडायला तयार! रामाने सांगितल्या आठवणी खास लंकेत झालेल्या त्या युद्धाच्या खास! कुंभकर्ण कसा जागा झाला. लक्ष्मण कुठे बेशुद्ध झाला. मारुतीने पर्वत संजीवनीसाठी उचललासर्पाच्या विळख्यातून गरुडाने मुक्त केला! वानरांनी पराक्रम गाजवला रामसेतू कुठे बांधला. खारीने आपला वाटा उचलला. हनुमानाने लंका जाळली सीतेला शोधून काढला! शबरीच्या बोरांनी रामाचा झाला सन्मान अशा अनेक आठवणींनी भरलेला भारलेला तो विमान प्रवास ! अयोध्या आली आनंद पसरला.आसमंत सारा उजळला. “प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!”“प्रभू श्रीरामचंद्र की जय!” – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 44 – सीता राम पुष्पक विमानात Read Post »

Dr. Anil Mokashi telling stories to children

रामायणाच्या गोष्टी 43 – सीतेची अग्निपरीक्षा

श्रीराम श्रीराम श्रीराम ! रावणाचा अंत झाला. आनंदी आनंद गडे. जिकडे तिकडे चोहीकडे. मारुतीने धाव घेतली. सीतेला बातमी सांगितली. राम-सीतेची भेट झाली. सगळ्यांच्या डोळ्यांत खुशी आली! पण या आनंदावर सावली आली एक विचित्र कुजबुज पसरली! रावणाच्या कैदेत सीता शुद्ध कशी. कोणीतरी दुष्ट शंका घेई अशी. कुजबुज मोहीम बदनामीची लाटच जशी. राम राजा न्यायप्रिय शंका दूर करणं होतं आवश्यक! त्यांनी सीतेला विचारलं ती शांतपणे धैर्याने बोलली! “मी गंगाजला सारखी पवित्र आहे. कोणतीही परीक्षा द्यायला तयार आहे!” सीतेने दिलं धैर्याचं उदाहरण कठीण वेळी संयमाचं दर्शन! शेवटी विजय सत्याचाच होतो हीच खरी अग्निपरीक्षा असते! अग्नीदेवता न्याय देती झाली. सीतेची पवित्रता सिद्ध झाली! सगळ्यांच्या मनातली शंका दूर झाली! सगळ्यांनी तिला वंदन केलं राम-लक्ष्मण आनंदाने हसले! पुष्पक विमानातून अयोध्येला निघाले त्यांच्याबरोबर मारुतीही आकाशात उड्डाणले! सियावर रामचंद्र की जयपवनपुत्र हनुमान की जयजयघोषांनी आकाश दुमदुमले! प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय.प्रभू श्री रामचंद्र की जय. – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास)

रामायणाच्या गोष्टी 43 – सीतेची अग्निपरीक्षा Read Post »

heat stroke child almost fainting under sun

बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय

मार्च महिना आला की तापानी फणफणलेली मुलं दवाखान्यात यायला सुरुवात होते. या तापाचं कारण लक्षात आलं नाही तर आग रामेश्वरी बंब सागेश्वरी अशी स्थिती निर्माण होते. ही उन्हाळयाची आग बाळांना फार त्रास देते. उष्माघात हा एक वर्षाखालील मुलांचा विशेषतः नवजात बालकांचा खास आजार आहे. कच्चे तपमान नियंत्रण :-शरिराच्या तपमानाचे नियंत्रन करणारे एक केंद्र मेंदुमध्ये असते हवेचं तपमान वाढलं की घाम येवून शरिर थंड होतं. लहान बाळांच तपमान नियत्रंण केंद्र अपरिपक्व असल्याने व्यवस्थित काम करत नाही. पत्रा तापतो, भांडी तापतात तशी मुलंही तापतात. बाल उष्माघाताची कारणे व उपाय :- उष्ण न खेळणारी हवा :पत्र्याचे छप्पर, कमी उंचीच्या छताची खोली, खेळती हवा नसलेली कोंदट खोली असेल तर उष्माघाताची शक्यता खूप जास्त असते. बालउष्माघात व्हायलाउन्हातच जायला हवे असे नाही. 15 दिवसाच्या बाळाला सुध्दा बालउष्माघात होऊ शकतो. त्यासाठी खोली थंड हवी. नसेल तर करायला हवी. कुलर लावणे पंखा लावणे, दारं खिडक्यांवर ओल्या चादरी टॉवेल टाकणे इ. उपाय करता येतात. खेडयातील आयांनी दुपारच्या वेळी बाळाला घेऊन दाट सावली असलेल्या झाडाखाली बसावे. लिंबाची सावली छान गारवा देते. बाळाला ताप आला असता दारं खिडक्या बंद, पंखे बंद करुन बाळाला जास्त त्रास होतो. अंगावरचे कपडे : मोठया माणसांना उकडायला लागलं तर ते हलके, पातळ, सुती कपडे घालतात. पण तापलेल्या बाळाला टोपी, स्वेटर, ब्लॅकेटमधे दडपून ठेवतात. हे उपाय ताप वाढवणारे आहेत. वारं लागू नये “बाधेल” अशा गैरसमजुतीपायी बाळाचे नुकसान होते. बाळाला कमीतकमी, हलके, सुती कपडे घालावे तापलेल्या बाळाला उघडे ठेवणे सर्वात उत्तम. शरिरातील पाण्याचे प्रमाण :वाढलेले तपमान कमी करण्यासाठी देवाने फक्त एकच यंत्रणा आपल्या शरिरात बसवली आहे. तपमान वाढले कि घाम येतो. त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरिरातील उष्णता वापरुन शरिर थंड होते. बाहेरुन कोरडया माठातले पाणी गार होत नाही. त्याचप्रमाणे घाम न आलेल्या बाळाचे तपमान वाढतच जाते. अशा बाळाला दिवसातून तीन चार वेळा गार पाण्याने पुसून घ्यायला हवे. उन्हाळयामुळे, उलटी जुलाबामुळे किंवा आजारपणात अन्नपाणी, अंगावरचे दूध न घेतल्यामुळे शुष्कता स्थिती निर्माण होते. शरिरात पाणी कमी असेल तर ताप येवून सुध्दा शरिर घामावाट पाणी बाहेर सोडू शकत नाही. पॅरासिटॅमॉल क्रोसीन हे औषध घाम आणण्याचे काम करते. शुष्कता स्थिती असेल तर पॅरासिटॅमॉलचा गुण येत नाही. तेव्हा शुष्कता स्थितीचे निदान करुन पाणी पाजले तरच ताप उतरतो अन्यथा नाही. बालउष्माघाताने अनेक मत्यू होतात. खुप रडणा-या व बेफाम तापलेल्या बाळाला योग्य निदान न झाल्याने अॅटिबायोटिक व झोपेच्या औषधांचा मारा केला जातो. पण मूळ कारण दूर न झाल्याने मुल तापतच राहते व रडतच राहते. त्यासाठी लहान बाळांच्या कुटुंबानी व फॅमिली डॉक्टरांनी बालउष्माघाताची शक्यता मनात ठेवली पाहिजे. तो होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, झाल्यास वेळेवर निदान करुन उपचार केले पाहिजे, नाहीतर ही सुंदर नाजूक फुलं रणरणत्या उन्हाळयात नाहक कोमेजून जातील. बालउष्माघाताची लक्षणे व उपाय : कडक उन्हाळा, बंद खोली, भरपुर कपडे, शुष्कता स्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे बालउष्माघाताची सर्व तयारी पुर्ण झाली असे समजावे. या परिस्थितीत योग्य ते बदल केले नाही तर आजाराच्या गांभीर्याप्रमाणे बालउष्माघाताच्या तीन पाय-या ओळखता येतात. पायरी तापमान (फॅ.) हृदयाचे ठोके डोळे तोंड व जीभ लघवी इतर लक्षणे उपाय पायरी 1 99 ते 101 150 खाली थोडे खोल सुकलेली कमी खूप रडणे, आतडी, चेहरा लाल मीठ-साखर पाणी, जलसंजीवनी, ओल्या फडक्याने पुसणे पायरी 2 101 ते 104 150 ते 200 खूप खोल थोडा ओलावा 8 तास नाही रडणे, दम लागणे अॅडमीट, सलाईन पायरी 3 104 वर 200 वर खोल व मऊ पूर्ण कोरडे 12 तास नाही दम लागणे, झटका येणे, बेशुद्ध होणे अॅडमीट, थंड करणे, थंड खोली, थंड पाण्याने उपचार, तातडीचा औषधोपचार – विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,पीएचडी (मुलांची वाढ व विकास) #

बाल उष्माघात : गंभीर परिणाम व सोपा उपाय Read Post »

Scroll to Top