आई वडोलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघतांना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रीयकियाप्रवर्तक (हारमोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनावर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो.
आईवडीलांच्या भांडणात मुलं काळजीनी घेरली जातात. घाबरतात, भेदरतात. त्यांना वाटतं त्यांच्या मुळेच भांडण होत आहेत. त्यांच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होते. आईवडील विभक्त होतील, घटस्फोट घेतील अशी त्यांना भिती वाटते. या तणावाखाली ती शाळेपेक्षा भांडणावरच आपलं लक्ष केंद्रीत करतात. वर्ग पुढे जातो. ती अभ्यासाात मागे पडतात. एकाग्रता कमी होते. अवधान काळ कमी होतो. त्यांची वर्तणूक बदलते. एकलकोंडी होतात. हसत नाहीत. कशात रस घेत नाहीत. हरवतात. चिडचिड, उलट बोलणे, उध्दटपणा, बेफिकीर वृत्ती, कुठेही दुखणे, अस्वस्थता, नैराश्य, नखे खाणे, गादी ओली करणे, बोबडेपणा, शाळा बुडविणे, आक्रमकता, इतरांशी न पटणे अशा पायरी पायरीने गंभीर मानसिक समस्या येवू लागतात.
मुलांच्या शैक्षणिक पिछेहाटीसाठी, वर्तणूक समस्यांसाठी मुलांना दोष देण्याआधी त्यात कौटूंबिक भांडणाचा भाग किती याचा विचार करायला हवा. आई वडिलांनी भांडतांना स्वतःवर मर्यादा घालून घ्यायला हव्या. त्या पाळायला हव्या.
भांडणप्रसंगी काय करावे:
शांत रहावे. एक ते दहा आकडे म्हणून रागावर ताबा मिळवावा.
राग शांत झाल्यावर समस्येवर चर्चा करावी.
मोजून मापून, स्पष्टपणे योग्य शब्दात बोलावे.
माफी मागायला व माफ करायला शिकावे.
सहसंमतिने मधूनच ‘पाणी’, ‘चहा’, ‘इतर’ यासाठी ‘भांडणविश्रांती’ घ्यावी.
भांडणप्रसंगी काय करू नये:
मारहाण, धक्काबुक्की, धमकावणे नको.
शिवीगाळ, निंदानालस्ती, सात पिढयांचा उध्दार नको.
निघून जावू नये. त्यानी प्रश्न सुटत नाही.
किंचाळून खेकसून बालणे नको. जाहीर भांडण नको.
मुलांना भांडणात ओढायला नको.
फक्त वयस्कांचे ‘लैंगिक’, ‘पैसे’, ‘सासुरवाडी’ असे विषय मुलांसमोर नको.
जुन्या चुका, जुने मुददे उकरून उकरून भांडण नको.
थोडीशी नोकझोक, वादविवाद हवेच. तो संसाराचाच एक भाग असतो. अगदी बंद दाराआड कुजबुजत भांडायची काही गरज नाही. आपल्या रागाला कुणाशी तरी बोलून वाट मोकळी करून देणं आवश्यक असतं. कुटूंबियांनी आपल्या भावना एकमेकांजवळ व्यक्त करायला हव्या. रागाच्या भरात बोललेलं सगळचं खरं नसतं हे मुलांना सांगायला हवे. कितीही भांडले तरी आईवडील एकमेकांवर प्रेम करतात हे त्यांना समजायला हवे. मुलांनी आई वडीलांना भांडतांना बघितल्यावर जुळवून घेतानाही बघायला हवे. त्यातून ते तडजोड किती जीवनावश्यक आहे, जुळवून कसे घ्यावे हे धडे शिकतील.
पण भांडणं वारंवार, जास्त काळ चालणारी, जास्त तीव्रतेची होवू लागली तर सल्ला घ्यावा. दोघांचाही विश्वास असेल अशा वडीलधा-यांचा किंवा मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यातच संपूर्ण कुटूंबाचं हित आहे. भांडणाचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक समस्या, दारूचं हाताबाहेर गेलेलं व्यसन, जुगार, पावित्रयाबद्दल शंका असे प्रश्न समुपदेशनातून उघड होतात व त्यांचे निवारण करता येते.
म्हणून म्हणतो, आईबाबांनो, भांडा पण जरा जपून, तुमची मुलं बघताहेत, ऐकताहेत, शिकताहेत.
– विद्यावाचस्पति डॉ. अनिल मोकाशी (बालरोगतज्ञ)
एमबीबीएस, एमडी, डीसीएच, एफआयएपी,
पीएचडी (मुलांची वाढ व विकास)


